भोकर तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम नसल्याने पर प्रांतात स्थलांतर.

भोकर तालुक्यात मजुरांची संख्या 25 हजाराहून अधिक आहे मात्र सद्यस्थितीत किती मजूर काम करतात हे शासनाच्या अधिकाऱ्यांनाच माहीत मागेल त्याला काम देण्याचा नियम असताना देखील मजुरांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्या जाते गावामध्ये कामे नसल्याने मजूर वर्ग उपासमारीची वेळ आली आहे स्थानिक पातळीवर गावात कामे नाहीत इतरत्र सुद्धा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कुठल्या काम दिसत नाही म्हणून गावातील मजूर वर्ग परप्रांतात कामासाठी जात आहेत अनेक कुटुंबाचे स्थलांतर झाले आहे
बोरवाडीचे शंभर कुटुंब कामासाठी तेलंगणात स्थलांतर तालुक्यातील बोरवाडीतील बहुतांश अल्पभुधारक शेतकरी व मजुर आहेत आज घडीस मजुरांच्या हाताला काम नसल्याने शंभरहून अधिक कुटुंबांचे स्थलांतर लगतच्या तेलंगणात झाले आहे.
बोरवाडी हे अतिदुर्गम जवळपास तीनशे कुटुंबाचे गाव असून सर्वच्या सर्व अल्पभूधारक आणि मजूर असलेल्या या गावात शेतीव्यतिरिक्त रोजगाराचे एकही साधन नाही. आधीच शेती कमी, तीही कोरडवाहू भयान अवस्थेत सापडलेल्या कुटुंबानी जगायचं तरी कसं ? कुटुंबाचा गाडा हाकायचा तरी कसा ? अशा विवंचनेत असलेल्या कुटुंबांना काम मिळेल तिथे स्थलांतर करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने बोरवाडीतील अनेक कुटुंबांनी शाळेत शिकत असलेल्या मुलाबाळांसह लगतच्या तेलंगणात स्थलांतर करणेच पसंद केले आहे. आभाळातील पाण्याच्या भरवशावर उरली सूरली शेती करून आता पाण्याअभावी शेती करता येत नसल्याने लगतच्या तेलंगणात कापूस वेचणी असो मिरच्या तोडणी, ज्वारी असो की हळद काढणीसाठी आदिवासींना स्थलांतराशिवाय पर्याय उरत नाही. आदिवासींसाठी असलेल्या किनवट येथील प्रकल्प कार्यालयात असलेल्या योजना येथील गावापर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र असून विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.

आता आम्ही जथ्थेच्या जथ्थे कापूस वेचणीसाठी बोरवाडीपासून २५० किमीवर तेलंगणा राज्यातील पोलमपल्ली (जिल्हा मंचेरीयाल) येथे दिवाळीपासून कुटुंबासह आलोत. गावात कोणतेच काम नसल्याने आम्ही दरवर्षी सहा महिन्यासाठी इकडे कामाला येतो.
——मारोती बोथकर
अल्पभूधारक शेतकरी, बोरवाडी

शेतीही नाही, कामही नाही आणि रोजगार हमीचे गावात कामही नाही, त्यामुळे इकडे दरवर्षी दिवाळीपासून उन्हाळ्यापर्यंत कामाला यावे लागते. आम्हाला आता तेलंगणातच बरे वाटते.
——सुशीलाबाई झाडे, बोरवाडी

ग्रामपंचायतीने विकासाचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे असते पण गावातील मनमानी कारभारामुळे विकास होत नाही मजुरांच्या समस्या कडे दुर्लक्ष केल्या जाते ज्या कामांमध्ये फायदा मिळतो ती कमी मात्र उरकली जातात
——भागेरथीबाई वानोळे
ग्रामपंचायत सदस्या, बोरवाडी

Google Ad