Adiwasi kranti Marathi news 04/08/2023
नांदेड- आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक महान क्रांतीकारक झाले. १९४२ च्या नंतर चले जाव
चळवळीला प्रारंभ झाला. अशातच क्रांतीसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार (पत्रीसरकार) स्थापन करुन
आपला कारभार लोकाभिमुख करुन आपणच चालवणे हे ध्येय उराशी बाळगून प्रतिसरकारांतर्गत सांगली-
सातारा जिल्ह्यातील पंधराशे खेडी गावातील रयतेसाठी कार्य करणारे थोर क्रांतीकारक म्हणजे क्रांतीसिंह नाना
पाटील होत असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.
गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे
दि. ३ ऑगस्ट २०२३ गुरुवार रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांना सळो की पळो
करुन सोडणारे, झुंजार नेते, प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त
आयोजिलेल्या अभिवादन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
पुढे बोलताना आपल्या भाषणात ते म्हणाले की, क्रांतीसिंह नाना पाटील यांना जेल झाली. नंतर ते
भूमीगत राहून प्रतिसरकारची सूत्रे हलविली. विनोदाच्या गोष्टीने व तुफान सेना काढून युवकांना एकसंघ करुन
जनजागृती केली. मुंबई येथील शिवाजी पार्कवर भरलेल्या भव्य अशा मेळाव्यात मराठी पत्रकार प्र. के. अत्रे यांनी
त्यांच्या कार्याप्रती त्यांना क्रांतीसिंह ही पदवी बहाल केली. संसदेत दोनवेळा खासदार म्हणून मराठीत भाषण
देणारे ते एकमेव व्यक्ती होते. अशा या महान विभूतींचा तुम्ही आम्ही सर्वांनीच आदर्श घेऊन समाजाप्रती-
देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे असेही ते यावेळी म्हणाले.
सर्वप्रथम आगार व्यवस्थापक मा. श्री. आशिष मेश्राम यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे
पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक अशोकराव
चव्हाण, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, विश्वासू प्रवासी संघटनेचे कार्यालयीन प्रमुख स. हरजिंदरसिंघ
संधू, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, गुलाम
रब्बानी, शाहरुख शमशोद्दीन लोहा, पाळीप्रमुख भरत ठाकूर, सौ. माया थोरात, सुनीता उपवाड, भागीरथी
सत्तलवार, नंदकुमार घाटोळ, संजय पटफळे, गजानन जाधव, भागवत सितळे, माधवराव सुरेवाड यांची प्रमुख
उपस्थिती होती. याप्रसंगी संतोष गोरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी
आगारातील कामगार- कर्मचारी, बंधु भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad